अमर हबीब : एका वेदनेला प्रतिसाद


FREEDOM, मराठी / Monday, March 2nd, 2020

आत्महत्या केलेल्या शेतकऱयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शेतकऱयांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी 19 मार्च रोजी देशविदेशतील किसानपुत्र आणि पुत्री दिवसभर उपवास करणार आहेत. हा उपवास म्हणजे वेदनेला दिलेला प्रतिसाद आहे. – अमर हबीब

साहेबराव करपे

पहिली सहकुटुंब आत्महत्या

19 मार्च 1986 या दिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असहय्य झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. साहेबराव करपे हे चिल-गव्हाण (यवतमाळ) येथील राहणारे. संगीताचे जाणकार होते. गावच्या सरपंच पदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी शेतकऱयांच्या बिकट परिस्थितीचे वर्णन केले होते. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे सरकारने लक्ष दिले नाही.

भीषण वास्तव

शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सुरू झालेले सत्र आजही थांबले नाही. सुमारे साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चाळीस ते पन्नास शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.

सरकारे बदलली पण शेतकऱयांचे हाल थांबले नाहीत. आता परिस्थिती आणखीन बिकट बनली आहे. कालपर्यंत शेतकरी आत्महत्या करीत होते, नवीन आकडेवारी वरून, आता शेतकऱयांची मुले म्हणजेच बेरोजगारही फार मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहे. मृत्यूने आता शेतकऱयांच्यास मुलांचाही पाठलाग सुरू केला आहे.

आपण काय करू शकतो?

आपण सरकार नाहीत. आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात क्रूर कायदे बदलण्याचे अधिकार नाहीत. आपल्या  हातात शास्त्रेही नाहीत. वेडाचारही करता येत नाही. मी साधा विचार केला. आपल्या घरात अशी घटना घडली तर आपण काय करतो? किमान एक दिवस आपल्याला घास जाणार नाही. बस हाच विचार 19 मार्चच्या उपवासाच्या मागे आहे.

शेतकऱयांच्या आत्महत्या होत असयाना माझ्यासारखा संवेदनशील माणूस त्या दुखाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करण्याच्या पलीकडे काय करू शकतो. उपवास हे सामान्य माणसाचे शस्त्र आहे! ते एकट्याने नव्हे लाखो लोकांनी उचलले तर मी मी म्हणणार्याना पळता भुई थोडी होऊन जाते. भारतीय जनतेने या शास्त्राचा वापर केला आहे. ते पुन्हा उचलण्याची गरज आहे.

साहेबराव करपे कुटुंबीयांच्या आत्महत्येच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने, 19 मार्च रोजी एक दिवसाचा उपवास करून आत्महत्या केलेल्या लाखो शेतकऱयांना श्रद्धांजली अर्पण करायची. तसेच शेतकऱयांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्प करायचा!

तीन पर्याय

ज्यांना शक्य असेल ते सामूहिकरित्या सार्वजनिक ठिकाणी बसून उपवास करू शकतात, पण ज्यांना बसणे शक्य होणार नाही, त्यांनी आपापले काम करीत उपवास करावा. खूप केले देवा धर्माचे उपवास. एक उपवास अन्नदात्यासाठी करावा. हवे तर उपवास सोडण्यासाठी एकत्र जमावे. तेही शक्य नसेल तर सोशल मीडियावर जाहीर करावे. शालेय विद्यार्थ्यानी उपवास केला पाहिजे असा माझा आग्रह नाही. त्यांनी दोन मिनिटे मौन पाळावे. एवढे केले तरी आज पुरेसे आहे.

शेतकऱयांच्या आत्महत्या ही मोठी राष्ट्रीय आपत्ती आहे. अन्य देशात एवढ्या आत्महत्यास झाल्या असंत्या तर त्या देशांच्या झेंडा अर्ध्यावर आणला असता. सगळी कामे थांबवून देशात एकाही शेतकऱयांची आत्महत्या होणार नाही याचा विचार केला असता. दुर्दैवाने आपल्या देशाच्या संसदेला दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करता आली नाही. याचा अर्थ असा की, पक्ष कोणताही असला तरी राज्यकर्त्यांना शेतकऱयांच्या जीवाची किंमत वाटत नाही. भले सरकार या आत्महत्यांबद्दल संवेदनशील नसेल, आम्ही तर आहोतना! आपण ही संवेदनशीलता व्यक्त करू!

हा उपवास कोणा एका पक्षाचा किंवा संघटनेचा नाही. प्रत्येक संवेदनशील व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकतो. अगदी सरकारी कर्मचारी देखील 19 मार्चला उपवास करू शकतात.

उपवास का करायचा? 

आपण हा उपवास का करायलाच हवा कारण अन्नदात्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आज तो संकटात सापडला आहे. हा उपवास करून आपण अन्नदात्याला दिलासा द्यायचा आहे. शेतकर्याची मुलं मुली आज शहरात गेली असली तरी ती शेतकऱ्याला विसरलेली नाहीत, याची जाणीव करून द्यायची आहे. शेतकऱयांप्रती आपली प्रतिबद्धता बळकट करायची आहे. 

हा उपवास कोणत्या मागणी साठी नाही पण शेतकरी आत्महत्या का करत आहेत? शेतकऱयांच्या आत्महत्या का थांबत नाहीत? त्या थांबाव्यात या साठी काय केले पाहिजे?  त्यासाठी मी काय करू शकतो? याचा विचार करण्यासाठी एक दिवसाचा हा उपवास आहे. होय, एक दिवस उपवास केल्याने प्रश्न सुटणार नाही हे खरे, पण प्रश्न सुटण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल यात शंका नाही.

आपण जेथे आहात तेथे हा एक दिवसाचा अन्नत्याग करता येईल. मी 19 मार्च 17ला साहेबराव करपे यांचया गावी जसुन महागाव येथे उपोषण केले होते. दुसर्या वर्षी त्यांनी जेथे आत्महत्या केली त्या दत्तपुरला भेट देऊन पवनार ला उपोषणाला बसलो होतो. दिल्लीत महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घरून राजघटवर उपोषण करणे. या वर्षी मी व माझे अनेक सहकारी पुण्यात उपोषण करणार आहोत.

तुम्ही कोण्या पक्षाचे, संघटनेचे असा, कोणत्याही विचारसरणीचे असा, व्यावसाय किंवा नोकरी करणारे असा, 19 मार्च रोजी एक दिवस उपवास करा! शेतकऱयांच्या वेदनेला प्रतिसाद द्या. असे नम्र आवाहन किसानपुत्र आंदोलनाने केले आहे. 

अमर हबीबशी habib.amar@gmail.com वर संपर्क साधता येईल.

We would love to hear your thoughts on this